डोळस आणि चिंतनशील कवी : शंकर बोईनवाड
------------------‐-‐------------------
कवी आणि साहित्यिक हे समाजाचे जागृत डोळे असतात. आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने ते समाजातील भावना, विचार, संस्कृती आणि जीवनमूल्ये यांचे जतन करतात. त्यांच्या शब्दांतून माणसाच्या सुख-दुःखाचे, आशा-आकांक्षांचे आणि संघर्षांचे चित्र जिवंत होते.
कवीच्या संवेदनशील मनाला निसर्ग, माणुसकी आणि जीवनातील विविध अनुभवांची सुंदर जाण असते. तो आपल्या कवितांमधून समाजाला विचार करायला लावतो, तर साहित्यिक आपल्या कथा, कादंबऱ्या, निबंध आणि लेखांच्या माध्यमातून समाजाला दिशा देतो. त्यांच्या साहित्यकृती केवळ मनोरंजन करत नाहीत, तर वाचकांच्या मनात संस्कार, प्रेरणा आणि सकारात्मक विचार मांडतात अशा नामावलीत
शंकर बोईनवाड यांचे नाव अग्रक्रमावर घ्यावे लागेल. बोईनवाड हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून स्वतंत्र विचारांची एक समृद्ध संस्कृती आहे. त्यांनी नायगावमध्ये साहित्याचे नवे आयाम निर्माण केले. विविध सांस्कृतिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेऊन नायगावच्या साहित्यिक वातावरणाला समृद्ध करण्यासाठी त्यांनी केलेले योगदान अत्यंत प्रशंसनीय आहे.
दैनिक श्रमिक एकजूट, उद्याचा मराठवाडा, अजिंठा, दैनिक सकाळ ,लोकमत यांसारख्या अनेक वृत्तपत्रांतून त्यांनी आपल्या प्रभावी लेखनाद्वारे जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. सामाजिक, शैक्षणिक तसेच साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक प्रतिष्ठित व नवोदित व्यक्तींचा परिचय त्यांनी आपल्या लेखणीतून समर्थपणे समाजासमोर उभा केला. त्यांच्या लेखनातून समाजप्रबोधन, साहित्यप्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.सामाजिक जाणीव असलेल्या शंकर बोईनवाड यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे झाला.
नायगावचे ज्येष्ठ कवी भारतभूषण गायकवाड यांच्या निधनानंतर नायगावच्या साहित्यविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्या पोकळीची भर काही प्रमाणात घालण्याचे कार्य त्यांचे शिष्य शंकर बोईनवाड यांनी केले. साहित्य, संस्कृती आणि समाजप्रबोधन यांचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला.
काही कारणास्तव शंकर बोइनवाड आज लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे स्थायिक झाले आहेत. उदगीरला समृद्ध सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरा लाभलेली आहे. या परंपरेला अधिक बळकटी देण्यासाठी त्यांनी ‘शालेय संकल्पʼ हे साप्ताहिक सुरू केले. या माध्यमातून त्यांनी सांस्कृतिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि विविध सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक उपक्रमांमध्ये नेहमीच आघाडीची भूमिका बजावली.
लातूर जिल्ह्यातील अनेक कवी, साहित्यिक आणि लेखकांचा परिचय त्यांनी ‘शालेय संकल्प’च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविला. ‘चिव चिव चिमणी’ ‘’ कोल्हेवाडीचा बाजार ,आदर्श नगरीचा राजू यांसारख्या विविध साहित्यकृतींची निर्मिती करून त्यांनी मराठी साहित्याची मोलाची सेवा केली आहे.
उत्तम कवी, संवेदनशील लेखक, आदर्श व्यक्तिमत्त्व आणि साहित्य-संस्कृतीचे अखंड उपासक म्हणून शंकर बोईनवाड यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी, आनंदी आणि दीर्घायुषी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
वीरभद्र मिरेवाड
साहित्यिक ,नायगाव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा