*“कुऱ्हाड गुत्तेदाराच्या हातात… संरक्षण वनविभागाचे!**देवणी सह लातूर व कर्नाटक राज्य मार्गाला जोडला जाणाऱ्या रस्त्या कडेची लाखो झाडे कापली, कारवाई शून्य”***झाडे तोडून मोकळे झाले!**देवणी–लातूर–कर्नाटक राज्य मार्गावर ‘विकास’ की उघड्या डोळ्यांनी झालेला पर्यावरण घात?*
*“कुऱ्हाड गुत्तेदाराच्या हातात… संरक्षण वनविभागाचे!*
*देवणी सह लातूर व कर्नाटक राज्य मार्गाला जोडला जाणाऱ्या रस्त्या कडेची लाखो झाडे कापली, कारवाई शून्य”*
**झाडे तोडून मोकळे झाले!*
*देवणी–लातूर–कर्नाटक राज्य मार्गावर ‘विकास’ की उघड्या डोळ्यांनी झालेला पर्यावरण घात?*
देवणी तालुक्यासह लातूर ते कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या राज्य मार्गाचे काम सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली जे घडले आहे, ते केवळ विकासकाम नव्हे तर निसर्गावर चालवलेला बेधडक कुऱ्हाड हल्ला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या मार्गावर लाखो वृक्ष अक्षरशः तोडून टाकण्यात आले, आणि आश्चर्य म्हणजे – गुत्तेदार आणि वनविभाग दोघेही निर्धास्तपणे मोकळे झाले आहेत! रस्त्याच्या दुतर्फा आजही कापलेले बुंधे, जमिनीवर पडलेली मोठी झाडे,स्पष्टपणे दिसून येते. ही तोड एखाद्या-दोन ठिकाणी झालेली नसून, संपूर्ण मार्गभर पसरलेली आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणावर वृक्षसंहार होत असताना वनविभागाने नेमकी काय भूमिका बजावली? हा प्रश्न आता जनतेतून संतापाने विचारला जात आहे. कायद्यानुसार वृक्षतोड ही ठरावीक परवानगी, अटी व पुनर्लागवडीच्या बंधनासहच होऊ शकते. मात्र प्रत्यक्षात तोड झालेल्या झाडांचा आकडा पाहता, ही प्रक्रिया नियमांच्या चौकटीत झाली आहे, असे म्हणणे कठीण आहे. त्यामुळेच वनविभाग आणि रस्ता काम करणारा गुत्तेदार यांच्यात नेमके काय संगनमत झाले? कुणाचे किती हप्ते ठरले?
हे प्रश्न आता उघडपणे चर्चेत आले आहेत.
जर सर्व तोड कायदेशीर असेल, तर परवानगीचे तपशील का समोर येत नाहीत? आणि जर तोड बेकायदेशीर असेल, तर आजवर एकाही अधिकाऱ्यावर किंवा गुत्तेदारावर कारवाई का झाली नाही? ही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारी बाब आहे.
पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तोच वनविभाग या संपूर्ण प्रकरणात मूक प्रेक्षक का बनला आहे, हे कोडे उलगडत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात असताना कोणतीही दंडात्मक कारवाई, गुन्हे दाखल करणे किंवा काम थांबवण्याची ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे ही शांतता म्हणजे निष्काळजीपणा नसून जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत.
या वृक्षतोडीचा फटका केवळ आजच्या दिवसापुरता मर्यादित नाही. रस्त्यालगतची हिरवळ नष्ट झाल्याने भविष्यात तापमानवाढ, पाणीटंचाई, शेतीवरील परिणाम आणि जैवविविधतेचा ऱ्हास अटळ आहे. विकासाच्या नावाखाली अशी पर्यावरणहानी स्वीकारायची का, हा प्रश्न देवणी तालुक्यापुरता मर्यादित राहिलेला नाही.
आज परिस्थिती अशी आहे की –
झाडे तोडली गेली, लाकूड गायब झाले, काम सुरूच आहे आणि जबाबदार मात्र कुणीच नाही!
हे नेमके कसले प्रशासन? हा कसला विकास?
देवणी तालुक्यातील नागरिक आता ठामपणे मागणी करत आहेत की,
गुत्तेदार आणि संबंधित वनविभागीय अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी व कठोर कारवाई झालीच पाहिजे.
अन्यथा “विकास” या शब्दाआड लपलेला हा पर्यावरणविनाश भविष्यात आणखी गंभीर रूप धारण करेल, यात शंका नाही.
*दयानंद कांबळे नागराळकर*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा